माणगांव तालुक्यातील रानकुत्र्यांच्या अस्तित्वाचा उलगडा, डोंगरोली गावातून पहिल्यांदाच छायाचित्रित पुरावा
१० रानकुत्र्यांचा कळप; आजूबाजूच्या गावांतुन मारत आहे बकऱ्या
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. २०- माणगांव तालुक्यातील डोंगरोली गावात बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी१० रानकुत्र्यांचा कळप पहिल्यांदाच पाहण्यात आला आहे. डोंगरोली बांबू नर्सरी च्या दया आणि आनंद पत्की ह्या दाम्पत्याने हे कुत्रे पाहिले आणि छायाचित्रित देखील केले आहेत. सायंकाळी ६:१५ च्या सुमारास दया पत्की ह्यांना आपल्या बांबू नर्सरी समोर रस्त्यालगत हे कुत्रे दिसून आले असता त्यांनी तातडीने माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना संपर्क साधला, कुवेसकर यांनी कोणत्याही परिस्थितीत एखादे छायाचित्र टिपून छायाचित्रित पुरावा मिळवण्याचा आग्रह केला, त्यानंतर दया आणि आनंद पत्की यांनी रानकुत्र्यांचा पाठलाग केला असता त्यांना रानकुत्रे माळरानावर रस्त्यालगत बसले असल्याचे दिसून आले, आपल्या फोनच्या माध्यमातून त्यांनी छायाचित्रे टिपली, त्यानंतर रानकुत्रे लगतच्याच जंगलात पळून गेले, पाहणी केली असता गवतावर रक्त आणि आतडे पडले असल्याने रानकुत्र्यांनी काहीतरी शिकार केले असल्याचे पत्की यांच्या निदर्शनास आले.
शंतनु कुवेसकर यांनी डोंगरोली गावात चौकशी केली असता सायंकाळी डोंगरोली गावातील काही बकऱ्या गायब असल्याचे कळले, प्रथम दर्शनी बिबट्यानेच बकऱ्या खाल्या असल्याचा ग्रामस्थांचा समज होता, परंतु रानकुत्रे बकऱ्या मारत असल्याचे ह्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कुवेसकर आणि पत्की दाम्पत्याने दुसऱ्याच दिवशी सकाळी रानकुत्र्यांच्या शोधात आजुबाजुचा सर्व परिसर पिंजून काढला, आजूबाजूच्या गावातून देखील काही दिवसांपासून बकऱ्या मारल्या जात असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. येथील स्थानिकांना कोळसुंदा म्हणजेच रानकुत्र्यांबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे बिबट्या, कोल्हा किंवा इतर गावातून भटके कुत्रे येऊन बकऱ्या खाल्या असाव्यात असा समाज होत आहे परंतु येथे हे रानकुत्रेच बकऱ्या खात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच आनंद आणि मी रानकुत्र्यांबद्दल चर्चा केली होती आणि योगायोगाने पुढच्याच दिवशी आनंद यांना रानकुत्रे दिसून आले, यापूर्वी देखील मागील १० वर्षांमध्ये माणगांव तालुक्यातील विविध गावांमधून रानकुत्र्यांच्या मी नोंदी केल्या होत्या पण कॅमेरा ट्रॅप शिवाय छायाचित्रित नोंद मात्र मिळत नव्हती, डोंगरोली शेजारील गोवेले गावात देखील रानकुत्र्यांचे फार दुर्मिळ दर्शन होते, रायगड जिल्ह्यात रोहा, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि माणगांव परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये रानकुत्र्यांचा वावर वाढला आहे, जुनी जाणकार लोकं सोडली असता स्थानिकांना रानकुत्र्यांबद्दल फारशी माहिती व जनजागृती नसल्यामुळे, कोल्हा किंवा भटका कुत्रा समजून रानकुत्र्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.असे शंतनु कुवेसकर यांनी सांगितले.
रानकुत्रे (कोळसुंदा) म्हणजेच ढोल यांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत वाघाइतकेच संरक्षण देण्यात आले आहे, आपल्या बकरी किंवा कोणत्याही पाळीव प्राण्यावर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास सदरील वन्यप्राण्याला कोणतीही इजा न पोहोचवता तातडीने किंवा पंचनाम्यासाठी ४८ तासाच्या आत स्थानिक वनरक्षक किंवा नजिकच्या वनविभाग कार्यालयात संपर्क साधण्याचे आव्हान वनविभागामार्फत करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या