नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई मिळावी-तालुका चिटणीस रमेश मोरे
शेकाप माणगांवकडून तहसीलदारांना निवेदन
माणगाव- दि.-१८- माणगांव तालुक्यातील बहुतांश सर्व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतात. हे भाताचे पीक सद्या परिपक्व झालेले आहे. त्यामुळे आता सदर पिकाची कापणी करणे आवश्यक आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच पावसाबरोबर वारा पण असल्याने भातशेती पूर्णतः उध्वस्त झालेली दिसून येत आहे. या नुकसान झालेल्या भातशेतीचे तात्काळ पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेकाप माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन दि. १८ऑक्टोबर रोजी माणगांव तहसीलदार प्रियांका आयरे यांना देण्यात आले आहे.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, जेष्ठ नेते अस्लम राऊत, नवनिर्वाचित देगाव सरपंच सुषमा वाघमारे, दिनेश गुगले, नितीन वाघमारे, योगेश मोरे, विलास मोरे, नथुराम आडीत आदी शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चालू असलेल्या परतीच्या पावसामुळे संपुर्ण हाता तोंडाशी आलेलं पीक पावसामुळे उध्वस्त झालेले आहे. पाऊस पडत असल्याने शेतात गुडघाभर चिखल आहे. त्यामुळे भातशेती कापणे कठीण झाले आहे. शेती, पेरणी, लावणीचा खर्च देखील आता वसूल होणार नसल्याने पुन्हा आता भात कापणचा खर्च शेतकऱ्याच्या खिशातून करावा लागणार असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे लवकरात लवकर भातशेतीचे तात्काळ पंचनामे संबंधित अधिकारीवर्गाने करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आली आहे.




0 टिप्पण्या