संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त कडापे येथे रक्तदान अभियान
६३ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान
रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २५- रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशभर आयोजित रक्तदान श्रृंखलेच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड नं. २ निरंकारी चौक, दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्या वेळी विशाल जनसमूदायाला संबोधित करताना व्यक्त केले.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय जोगिन्दर सुखीजाजी यांनी या देशव्यापी रक्तदान अभियानाची माहिती देताना सांगितले, की दिल्ली व एनसीआर येथे १२०० यूनिट तर संपूर्ण भारतवर्षामध्ये ५०००० हून अधिक रक्त संकलित करण्यात आले. याच महा रक्तदान अभियाना अंतर्गत कडापे ता.माणगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६३ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने आणि मानवसेवेच्या उत्कट भावनेने रक्तदान केले.
सद्गुरु माताजींनी मानव परिवाराला संबोधित करताना सांगितले, की रक्तदान हे निष्काम सेवेची अशी एक सुंदर भावना असते ज्यामध्ये सकळीकांच्या भल्याची कामना निहित असते. त्यामध्ये अशी भावना उत्पन्न होत नाही, की केवळ आपले सगे-सोयरे किंवा आपले कुटुंबच महत्वपूर्ण आहे, तर अवघे विश्वच आपला परिवार बनून जाते.
हेही सर्वविदित आहे, की निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे. त्याबरोबरच सेवेचे पुंज, पूर्ण समर्पित गुरुभक्त चाचा प्रतापसिंह व अन्य महान बलिदानी संतांचेही या दिवशी स्मरण केले जाते. ‘मानव एकता दिवस’ दिनी संपूर्ण देशामध्ये जागोजागी सत्संग समारोह आणि विशाल रूपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन केले जाते. त्यानंतर रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते.
रक्तदानाचे महत्व समजावताना सद्गुरु माताजींनी म्हटले, की ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नव्हे’. रक्त देताना ते कोणत्या शरीरामध्ये जाईल याचा आपण विचार करत नाही. हे तर एक मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारे सामाजिक कार्य आहे. निरंकारी राजपिता रमितजी यांनी स्वत: रक्तदान करुन याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रस्तुत केले.
याच श्रृंखले अंतर्गत देशभरातील संत निरंकारी मिशनच्या बहुसंख्य शाखांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. रक्त संकलित करणाऱ्या रक्तपेढ्या तसेच या शिबिरांना भेट देणाऱ्या गणमान्य व्यक्तींनी मिशन द्वारे केल्या जाणाऱ्या नि:स्वार्थ सेवांचे कौतुक केले. कडापे येथील रक्तदान शिबिरामध्ये जिल्हा रक्त पेढी अलिबाग रायगड यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.




0 टिप्पण्या